Draft:सोमवंशी क्षत्रिय (वाडवळ) Somvanshi Kshtriya vadval Community of South Kokan

शके १०६२ च्या सुमारास चंपानेरच्या प्रताप बिंबाने उत्तर कोकणावर स्वारी करून उत्तर कोकण हस्तगत केले आणि सोमवंशी क्षत्रियांचा वा भागात प्रवेश झाला. या नविन परंतु ओसाड व उद्धस्त स्थितीत असलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी राजा प्रताप बिंबाने चांपानेर व पैठण वेचून जी ६६ कुळे आणली. त्यात २७ कुळे सोमवंशी १२ कुळे सूर्यवंशी आणि ९ कुळे शेषवंशी सुमारे हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील उत्तर कोकणचा प्रांत ‘महिकावती नगरी’ किंवा ‘बिंबस्थान’ म्हणून ओळखला जाई. त्या परिसरातच वाडवळ समाजाची वस्ती आहे.

‘महिकावतीची बखर’ (लेखक – केशवाचार्य व इतर) हा प्राचीन दस्तऐवज आहे. बखरीत महिकावती राजधानी असलेल्या बिंब राजांचा इतिहास (वंशावळी) वर्णलेला आहे. बिंब राजे सोमवंशी व सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. ज्यांना वाडवळ असे संबोधले जाते ते त्यातील सोमवंशी राजांशी संबंधित आहेत. महिकावतीच्या बखरीबरोबर ‘बिंबाख्यान’(लेखक रघुनाथ पुतळाजी राणे), ‘अर्ली हिस्ट्री ऑफ बॉम्बे’ ‘उत्तर कोकणचा इतिहास’ (लेखक रा.ब. पु. बा. जोशी), ‘ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (लेखक डॉ.. जी. द. कुन्हा) इत्यादी ग्रंथांमधून सोमवंशी क्षत्रियांचा इतिहास उपलब्ध होतो.

या ग्रंथातील माहितीनुसार इसवी सन 1138 मध्ये सोळंकी घराण्यातील चौलुक्यवंशी राजा प्रतापबिंब याने उत्तर कोकणावर स्वारी करून उत्तरेकडील दीवदमणपासून दक्षिणेकडील वाळकेश्वरपर्यंतचा मुलुख ताब्यात घेतला. प्रतापबिंब सूर्यवंशी राजा होता व बाळकृष्ण सोमवंशी हा त्याचा प्रधान अमात्य होता. सूर्यवंशी व सोमवंशी ही दोन राजघराणी असून त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत असे. प्रतापबिंबाच्या वंशजांनी सुमारे एकशेएक वर्षे राज्य केले. त्यानंतर सुमारे दीडशे वर्षांनी देवगिरीचा राजा रामदेवराव यादव याचा एक पुत्र राजा भिमदेव ऊर्फ बिंबदेव यादव याने 1296 च्या सुमारास उत्तर कोकणचा मुलुख त्याच्या अधिपत्याखाली घेतला. बिंबदेव यादव हा सोमवंशी राजा होता. त्या दोन्ही राजांनी त्यांच्याबरोबर जी कुळे आणली त्यात सोमवंशीयांची संख्या सर्वात जास्त (सत्तावीस कुळे) होती. सोमवंशी क्षत्रिय कुळातील अनेकांनी तलवारबाजीबरोबरीने अधिकारपदेही गाजवली. काही क्षत्रियांनी रयत बनून राहणे पसंत केले. त्यांनी स्त्रियांच्या मदतीने शेती-बागायती केली. वस्ती समुद्रकिनारी असल्यामुळे त्या राजांनी आरमाराकडे खास लक्ष दिले. त्यांनी जहाजबांधणींच्या कामाला प्रोत्साहन दिले, तेव्हा अनेकांनी सुतारकी आत्मसात केली. ब-याच लोकांची उपजीविका शेती-बागायतीवर अवलंबून आहे. मात्र त्यांचा सुतारकीकडील अलिकडे ओढा कमी झालेला दिसून येतो.

सोमवंशी क्षत्रियांची क्षात्रवृत्ती लोप पावलेली नाही. पोर्तुगीजांविरुद्ध तसेच इंग्रजांविरोधी स्वातंत्र्यचळवळीत अनेक वाडवळांनी त्यांचे कर्तव्य बजावण्यात पुढाकार घेतलेला आहे. स्वातंत्र्यासाठी तुरूंगवासही आनंदाने स्वीकारला. लेफ्टनंट कर्नल प्रताप सावे, कर्नल सदाशिव वर्तक यांनी 1965 व 1971 च्या युद्धात कामगिरी बजावली. लेफ्टनंट कर्नल संग्राम वर्तक, कॅप्टन समीर राऊत, कमांडर अनिल सावे यांसारखे वाडवळ तरुण सैन्यात कार्यरत आहेत.

वाडवळांची वस्ती असलेल्या केळवे, तारापूर, चिंचणी, आगाशी, विरार, दातिवरे या सर्व गावांचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत त्याच नावांनी येतो. त्याचा अर्थ ती गावे तशीच हजार वर्षांपूर्वीपासून आहेत. बखरीत सोमवंशी क्षत्रियांच्या वंशावळी दिलेल्या आहेत. त्यात वर्णन केलेल्या सावे, चौधरी, वर्तक, म्हात्रे, चुरी, राऊत इत्यादी उपनामांनी ओळखली जाणारी क्षत्रिय कुळे त्या परिसरात वस्ती करून आहेत. प्रतापबिंबाने राजधानी म्हणून केळवे माहीम या ठिकाणाची निवड केली. त्या परिसरातील महिकावती देवीवरून त्याने त्याच्या राज्याला ‘महिकावतीचे राज्य’ असे नाव दिले. त्याची त्या परिसरावरील हुकूमत संपुष्टात आल्यामुळे त्याला मुंबई बेटात अडकून पडावे लागले, तेव्हा तेथे नवीन परिसर वसवताना त्याने केळवे-माहीम परिसरातील गावांची व आळ्यांची नावे नव्या भागांसाठी योजली. केळव्याला शितळादेवीचे मंदिर आहे, तसेच मंदिर त्याने मुंबई-माहीम परिसरात बांधून घेतले.

सोमवंशी क्षत्रिय कुळे उत्तर कोकणात येण्यापूर्वीपासून त्यांची संस्कृती प्रगत होती. त्या कुळांची स्वतंत्र गोत्रे, प्रवर यासह बखरीत माहिती येते. त्यांच्या कुलदेवता आहेत. ते देवतांची विधिवत पूजाअर्चा करत असत. पौरोहित्य करण्यासाठी माध्यंदिन शुक्ल यजुर्वेदी वाजसेनीय शाखेच्या ब्राह्मणांना ते त्यांच्याबरोबर घेऊन आले. मुलांच्या जन्मापासून बारसे, मुंज, लग्नसोहळा अथवा मृत्यू अशा मानवी जीवनातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगी मंत्रांसह संस्कारविधी करण्याची प्रथा त्यांच्यात होती. ते जानवे वापरत. महत्त्वाचे प्रसंग साजरे करताना स्त्रिया गाणी गात असत. तेव्हाची काही गाणी मौखिक परंपरेने चालत आली आहेत. बारशाच्या अथवा लग्नसोहळ्याच्या वेळी ती गाणी गायली जातात. त्या गाण्यांतील काही शब्द जे भाषेतून लुप्त झाले आहेत. मात्र ते बाराव्या शतकातील ज्ञानेश्वरांच्या तसेच एकनाथ-तुकारामादि संतांचे साहित्य, शाहिरी काव्य, मौखिक परंपरेने जपल्या गेलेल्या स्त्रियांच्या ओव्या यांमध्ये आढळतात. त्यावरून वाडवळी गाण्यांची प्राचीनता सिद्ध होते.

वाडवळ समाज दिवाळी, होळी यांसारखे सण, ग्रामदेवतांच्या यात्रा अशा उत्सवांमध्ये आग्रहाने सहभागी होतो. शतकभरापूर्वीपर्यंत वाडवळ समाजातील प्रतिष्ठित मंडळी होळीत रंगांचा सण साजरा करत. त्यात वाडवळांमधील प्रमुख पुरूषाला प्रथम रंग उडवण्याचा मान मिळत असे. वाडवळ समाजाची वस्ती असलेल्या गावांमध्ये नेतृत्वाची धुरा सांभाळण्याकडे वाडवळांचा कल दिसून येतो.

लग्नात हुंडा देणे-घेणे वाडवळ समाजात पूर्वीपासून निषिद्ध मानले जाते. लग्नप्रसंगी नवरदेव वधुगृही वरात घेऊन जातो तेव्हा त्याला चंदनी सिंहासनावर बसवून मिरवत नेण्याचा मान खुद्द बिंबराजाने दिला होता. अशा प्रकारचा मान फक्त सोमवंशीयांना दिला गेला होता. लग्न लागल्यानंतर वधूला त्याच सिंहासनावर बसवून नव-याच्या घरी आणले जात असे. ऋतुमती न झालेल्या वधूलाच सिंहासनावर बसण्याचा अधिकार होता. पूर्वी बालविवाहाची पद्धत होती. ‘शारदा कायदा’ 1930 मध्ये लागू झाल्यानंतर बालविवाहावर बंदी आली. मुलींच्या लग्नाचे वय वाढले आणि ती प्रथा हळुहळू बंद पडली. वाडवळांच्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी गावोगावच्या आप्तांना व समाजबांधवांना आदरपूर्वक निमंत्रण देऊन बोलावले जाई. यजमानगृही पाहुण्यांचा सत्कार केला जाई. गावोगावच्या प्रमुखांचा आदरपूर्वक उल्लेख करून त्यांच्या कपाळावर सन्मानाचा टिळा लावून त्यांना विडा देण्याची पद्धत होती, ती लुप्त झाली आहे.

वाडवळांमध्ये पूर्वीपासून विधवाविवाहाला मान्यता होती. त्यामुळे बालविधवा व तिचे शोषण या दुष्ट रूढीला वाडवळ समाजात थारा मिळू शकला नाही. सपुत्रिक विधवेचा तिच्या मुलासह स्वीकार करण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणारा वाडवळ समाज आहे. प्रथम पतीपासून झालेल्या पत्नीच्या अपत्याच्या जीवनाची पूर्ण जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न नवीन घरी कसोशीने केला जाई. कारण त्या गोष्टीचा संबंध सामाजिक प्रतिष्ठेशी जोडला जात असे. निपुत्रिक दांपत्य त्यांच्या नात्यागोत्यातील मुलाला दत्तक घेई, अथवा पत्नी स्वतःच तिच्या पतीचा विवाह पुढाकार घेऊन एखाद्या परिचित स्त्रीबरोबर घडवून आणी. वंशसातत्यासाठी स्वेच्छेने सवतीला स्वीकारणारी, सवतीला बहिणीप्रमाणे वागवणारी; तसेच, सवतीची मुले प्रेमाने वाढवणारी प्रथम पत्नी ‘मोठी आई’ म्हणून सन्मानाने कुटुंबात वावरत असे.

वाडवळांमध्ये नृत्य करण्याला फारशी प्रतिष्ठा मिळालेली नाही. सोमवंश हा प्रशासन करणा-यांचा राजवंश असल्यामुळे असेल कदाचित, इतरांचे मनोरंजन करण्याला त्या समाजात सामाजिक प्रतिष्ठा मिळू शकली नसावी. स्त्रिया लग्नप्रसंगी किंवा होळीची गाणी गाताना क्वचित प्रसंगी नृत्य करत, मात्र तो परिसर स्त्रियांसाठी केवळ राखीव असे. सार्वजनिक ठिकाणी नाचणे वाडवळांना मानवत नसे. नव्या बदलत्या जमान्यात वाडवळांची मानसिकता बदलत असल्याचा अनुभव येत आहे.

वाडवळ समाजात निरक्षरांची संख्या गेल्या शतकापर्यंत मोठी होती. स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास-साठ वर्षात हा समाज शंभर टक्के साक्षरतेपर्यंत पोचला आहे. मुंबईलगत वस्ती असल्याचा फायदा समाजाला मिळाला आहे. मागच्या शतकापर्यंत गरिबीत जगणारा समाज शेतीबरोबर शिक्षणाच्या आधाराने नोकरी करू लागला. त्यातून त्याने स्थैर्य मिळवले. तरुणांनी उद्योगाची विविध क्षेत्रे आपलीशी करावी यासाठी आवर्जून प्रयत्न केले जात आहेत. वसई व पालघर तालुक्यांतील वाडवळ पानवेलीच्या शेतीत तर डहाणू तालुक्यातील वाडवळ चिकूच्या शेती व्यवसायात अग्रेसर आहेत. पानवेलीची शेती करत असल्यामुळे वाडवळांना ‘पानमाळी’ असेही म्हटले जाते. नवीन पिढी उद्योग, पर्यटन, पत्रकारिता, कॅटरिंग व रिसॉर्ट व्यवसायात उतरली आहे.

घरात आणि गावात असताना वाडवळ स्वतःच्या बोलीतून संवाद साधतो. स्वतःची अशी संथ व सौम्य लय असलेल्या वाडवळी बोलीचा तिचा असा वेगळा लहेजा आहे. ती मूळ मराठीशी नाते बांधून आहे. मौखिक परंपरेने चालत आलेली अनेक लोकगीते व कहाण्या यांचा वाडवळी बोलीतील साठा वर्तमानापर्यंत चालत आला आहे. त्यातील काही लोकगीतांचा संग्रह ‘ठेवा वाडवळी लोकगीतांचा’ (संग्राहिकाः नूतन पाटील, प्रकाशकः कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी) या पुस्तकात केला गेला आहे.

सोमवंशी क्षत्रिय समाजाचे एकूण पाच पोटभेद आहेत. त्यातील पाचकळशी व चौकळशी या दोन उपजातींना ‘वाडवळ’ असे म्हटले जाते. बिंबराजाने दिलेल्या सिंहासनाशी त्याचा संबंध सांगितला जातो. ज्यांच्या सिंहासनाला पाच कळस जोडण्याचा मान मिळाला त्यांना ‘पाचकळशी’ तर ज्यांच्या सिंहासनाला चार कळस जोडण्याचा मान होता, त्यांना ‘चौकळशी’ असे म्हटले जाऊ लागले. युद्धात गाजवलेल्या पराक्रमाशी त्याचा संबंध असल्याचे सांगितले जाते. ‘क्षात्रैक्य परिषदे’च्या व्यासपीठावरून सोमवंशी क्षत्रियांच्या पाचही शाखांच्या एकीकरणाचे प्रयत्न चालू आहेत.

पोर्तुगीजांच्या काळात वसई परिसरात धर्मांतराच्या घटना घडल्या. त्यावेळी काही वाडवळ कुटुंबे धर्मांतरित झाली. त्यांना वसई परिसरात ‘वाडवळ ख्रिश्चन’ म्हणून ओळखले